Wednesday, December 3, 2014

नमी

न जाने क्यूँ, कभी अचानक 
आँखोंमें नमीसी आ जाती हैं …  
पास होते हैं लोग फिर भी,  
एक तनहाईसी लगती हैं …   

खो जाता हैं मन 
यादों की गहराइयोंमे,
और चाहता हैं कई चीज़ें,
जो उसे पता होता हैं 
कभी नहीं मिलनेवाली …   

शायद वही चाहते हलकेसे 
आँखोंमैं चली आती हैं …  
उन्हें पता होता हैं जैसे,   
मन से बाहर निकलनेका 
यही एक रास्ता हैं शायद … 
न जाने क्यूँ, कभी अचानक 
आँखोंमें नमीसी आ जाती हैं … 

Friday, October 3, 2014

खिडकी

हॉटेलच्या खिडकीतून काय सुंदर नजारा दिसतोय !
चहुबाजूला पसरलेली गर्द झाडं, मधोमध एक इवलसं तळं
आकाशात काठोकाठ भरलेले काळे-करडे ढग … 
 सैराभैरा उनाडणाऱ्या वाऱ्याची पावलं,
तळ्याच्या शांत पाण्यावर उमटतायत… 
आकाशातले संध्याकाळचे असंख्य रंग,
पानांनी जमिनीमधून शोषून घेतलेयत… 
कुठे टवटवीत पिवळा, कुठे सचेतन नारिंगी,
कुठे लाघवी लाल तर कुठे नेहेमीचा निरागस हिरवा… 
(आपल्याकडे बोलावताना देवबाप्पा केवढं काही देतो नाही)    
 
या उनाड वाऱ्यात मला गारठून जायचं, 
तळ्याच्या थंड पाण्यात हात बुडवायचाय…
ती केशरी पिवळी पानं हातात घ्यायचीयेत… 
जमिनीवरच्या रंगीबेरंगी पाचोळ्यातून वाट काढायचीये… 
पण… 
पण मध्ये आहे ती हॉटेलच्या रूमची ही खिडकी… 
मला त्या बोचऱ्या थंडीपासून वाचवणारी, 
तो समोरचा सुंदर देखावा चित्रासारखा दाखवणारी,
पण कधीही उघडता न येणारी… 
खिडकी…      

Saturday, September 13, 2014

नभ आणि भुई

नभाच्या किनारी, सप्तरंगी निखारे
नभाच्या मनी, दाटले दुःख सारे

अलवार किरणांतुनी, सांजवेळी 
हळुवार नभ हे, भुईला विचारे 

"अथांग का मी? का एकटा?
का वाटते हे, असे बावरे ?

पडती मला का, असे प्रश्न ज्यांची 
नसती कुणा, माहिती उत्तरे" 

थांबून थोडे, धरा गोड हसते 
म्हणते "नभा, जरा थांब ना रे"

"होईल जेव्हा, किर्र अंधार तेव्हा    
पुसतील दुरुनी तुला, चांदण्या रे 

होईल तेव्हा, जग एकले अन
तुझ्या अंगणी शुभ्र, फुलतील तारे!" 

Saturday, March 29, 2014

का, कोण जाणे ?



काहीही गरज नसताना, अचानक,
काळ्याकुट्ट ढगांनी आभाळ
काठोकाठ भरून येतं…
सैरभैर वारा, जिकडे तिकडे धावत सुटतो …
उगाचच चार क्षण, वाऱ्या सोबत,
पाचोळा उंच उडून बघतो…
सळसळणारी असंख्य पानं,
कुठेतरी लपून आतुरतेनी शीळ
घालणारा आर्त कोकीळ,
उगाच हूल द्यायला म्हणून पडलेले
काही टपोरे थेंब…
पण, का कोण जाणे ?
पाऊस काही पडत नाही…
हळुवार ढग पांगतात,
मागून तिरपं उन्ह डोकावंतं,
निळं आभाळ मात्र कसं
दूर दूर दिसू लागतं…

आभाळा, का नाही बरसलास ??
इतकं जवळ येऊनही
इतका का रे दूर गेलास ?
भीती वाटली का रे,
तिच्यासमोर रडायची ?
अरे, त्या ओघवत्या थेंबांमधूनतर
तिला भेटला असतास…
हलक्याशा सरींमधून
हळुवार उलगडला असतास…
तुला असं  वाटलं  का रे,
कि थेट धरतीवर पोहोचतील,
इतके मेघ जमवलेयस तू…

एकेक शब्द जमवता जमवता,
असंच निःशब्द व्हायला होतं गड्या…
का, कोण जाणे ?